भारत देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचा मोठा वाटा : प्रांताधिकारी मौसमी चौगुले

शिरोळ/ प्रतिनिधी:
प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष प्रवेश विद्यार्थी स्वागतोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी येथील प्रांताधिकारी मौसमी चौगुले, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चेअरमन गणपतराव पाटील, शिरोळ तालुका तहसीलदार अनिलकुमार हेलेकर, मॅनेजिंग डायरेक्टर एम. व्ही. पाटील, ट्रस्टचे डायरेक्टर ए. एम. नानीवडेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रथम पवर्ष प्रवेश विद्यार्थ्यांना फुलांची रोपे देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना मौसमी चौगुले म्हणाल्या, भारत देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचा (engineer) मोठा वाटा आहे. अभियंता दिनी विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. शिक्षण घेण्यासाठी अपार कष्ट, जिद्द, चिकाटी ठेवा. भारताला महासत्ता होण्यासाठी आपले योगदान द्यावे लागेल. सर विश्वेश्वरय्या यांनी बांधलेले धरण आजही सुस्थितीत आहेत. असे अभियंते आपणही बनले पाहिजे असे सांगून त्यांनी केलेल्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला. दत्त पॉलिटेक्निक कॉलेज मधील परीसर पाहून मी भारावून गेले असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजला विद्यार्थ्यांनी पसंती दिल्याबद्दल आभार मानले. तसेच या संस्थेत आपल्या शिक्षणासाठी लागेल त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल व विविध तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन देऊन एक उत्कृष्ट अभियंता (engineer) बनविण्यासाठी प्रयत्न व शेवटच्या वर्षात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
प्रास्ताविक प्राचार्य पि. आर. पाटील यांनी केले. सुत्रसंचलन डी.व्ही. सुतार, पार्श्व पोमाजे, दर्शन बंडगर, प्राची पाटील यांनी केले. आभार ए. टी. पाटील यांनी मानले.