महाराष्ट्र निर्बंधमुक्त होतोय, तुझी कृपा असू दे रे बाबा….!
नुकतीच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र निर्बंध मुक्तची घोषणा केली आहे. त्यामुळे आता प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे ‘प्रवाशांना व्यवस्थितरित्या सेवा पुरविण्याचे बळ दे आणि तुझी कृपा आमच्यावर असू दे…’, असे साकडे घालत, खासगी वाहतूकदारांंनी शुक्रवारी आपल्या लक्ष्मीची मनोभावे पूजा केली
कोरोना काळात तब्बल दोन वर्ष खासगी वाहतूकदारांचा व्यवसाय बंद होता. त्यांच्या गाड्या जागेवरच उभ्या होत्या. अनलॉकमध्ये काही नियम अटींवर गाड्या सुरू करण्याची परवानगी मिळाली खरी. पण, बँकांचे हप्ते, गाडी जागेवर उभी असल्यामुळे आलेला लाखोंचा मेंटनन्स खर्च, परिवहन कर, यामुळे खासगी वाहतूकदारांचे कंबरडे मोडले होते. आता खासगी वाहतूकदारांचा व्यवसाय हळू-हळू पुर्वपदावर येत आहे. आणि त्यातच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे आता त्यांचा व्यवसाय पुर्वीप्रमाणे जोमात सुरू होणार आहे. त्यामुळेच आणि गुढीपाडव्याचे निमित्त साधून शुक्रवारी दुपारच्या सुमारास खासगी वाहतूकांनी आपल्या गाडीची म्हणजेच लक्ष्मीची मनोभावे पुजा केली. यावेळी स्टाफ ट्रान्सपोर्ट करणार्या चालकांबरोबर महेंद्र पठारे, प्रशांत शितोळे, कॉन्टिनेन्टल इंटरलिकचे संचालक विकास राजपूत, पुणे बस अँड कार ओनर असोसिएशनचे कार्याध्यक्ष किरण देसाई व अन्य खासगी वाहतूकदार उपस्थित होते.