दहा लाख टन ऊस शिल्लक तरीही नऊ कारखाने झाले बंद, शेतकरी हवालदिल

संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद होऊ देणार नाही, अतिरिक्त ऊस शेजारच्या कारखान्यांकडे वळवू, अशा घोषणा सरकार आणि प्रशासनाकडून होत असल्या तरी नगर जिल्ह्यात वेगळे दृष्य पहायला मिळत आहे. जिल्ह्यात अद्याप १० लाख टन ऊस गाळपाविना शेतात उभा आहे. असे असूनही जिल्ह्यातील नऊ साखर कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे सुरू असलेल्या १४ कारखान्यांवर याची जबाबदारी आली आहे. त्यात यावर्षी पाऊस लवकर येणार असल्याचे अंदाज येऊ लागल्याने तोपर्यंत गाळप पूर्ण होणार का? अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे.

अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कारखानदारांची बैठक घेऊन अतिरिक्तउसाच्या गाळपाच्या सूचना दिल्या. मात्र, ऊस तोडणी मजूर गावाकडे परतू लागल्याने नवीच अडचण कारखान्यांकडून सांगितली जात आहे. त्यामुळे आता ऊसतोडणीसाठी यंत्र उपलब्धत करण्याचे प्रयत्न सुरू झले आहेत.
नगर जिल्ह्यात १४ सहकारी व ९ खासगी असे एकूण २३ साखर कारखाने आहेत. यातील क्रांती शुगर (पारनेर), साजन (देवदैठण,श्रीगोंदे-जुना साईकृपा), जयश्रीराम (कर्जत) व राहुरीचा डॉ. बाबूराव दादा तनपुरे असे चार कारखाने आधीच बंद झाले आहेत. लवकरच पियुष (नगर तालुका), कुकडी व नागवडे (श्रीगोंदे), अंबालिका (कर्जत) व युटेक (संगमनेर) हे पाच कारख़ाने बंद होणार आहेत. २३ पैकी ९ कारखाने बंद झाल्याने राहिलेल्या १४ कारखान्यांवर अतिरिक्त ऊस गाळपाची जबाबदारी आली आहे.

जिल्ह्यात सर्वच तालुक्यांतून अतिरिक्त ऊस असला तरी श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक सव्वा दोन लाख मेट्रीक टन ऊस अजूनही शेतात उभा आहे. वाढत्या उन्हाने उसातील रसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतकरी हवालदिलझाले आहेत. नगर जिल्ह्यात यंदाच्यागाळप हंगामात पावणे दोन कोटीवर मेट्रीक टन ऊस उपलब्ध असल्याने यंदाअतिरिक्त उसाची समस्या भेडसावण्याची शक्यता हंगाम सुरू होतानाच होती. जिल्ह्यात ३ मे पर्यंत १ कोटी ७३ लाख ३० हजार १३ टन उसाचे गाळप होऊन १ कोटी ७३ लाख ४९ हजार ८२८ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.०१ टक्के मिळाला आहे.

अतिरिक्त ऊसवाहतुकीसाठी तसेच कमी होणार्‍या साखर उतार्‍यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे तरी तोडणी होईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *