‘अलमट्टी’प्रश्नी मंगळवारी बैठक; मुख्यमंत्रीही घेणार आढावा
कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याच्या पूरस्थितीसाठी परिणामकारक ठरणार्या कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणी साठा नियंत्रण आणि नियोजनाबाबत मंगळवारी (दि. 31) सायंकाळी चार वाजता मंत्रालयात बैठक (meeting) होणार आहे. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी ही चार राज्यांची पूर समन्वय बैठक बोलविली आहे. कर्नाटकच्या महसूल आणि पाणी पुरवठा विभागांच्या सचिवांसह गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांतील संबंधित विभागाचे सचिव उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यात दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीला अलमट्टी धरणातील पाणीसाठा काही वेळेला कारणीभूत ठरतो. यामुळे पावसाळ्यात अलमट्टी धरणातील पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी कर्नाटकशी समन्वय साधला जात आहे. मंगळवारच्या बैठकीत पाणीसाठा नियंत्रणाबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
अलमट्टीसह उकई (गुजरात), संजयसागर (मध्य प्रदेश), श्रीरामसागर आणि निजामसागर (तेलगंणा) या धरणातील पाणीसाठ्यांच्या नियंत्रणाबाबतही बैठकीत संबंधित राज्याच्या अधिकार्यांशी चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत धरण, हवामानाबाबतच्या माहितीची देवाण घेवाण, समन्वयासाठी अधिकार्यांच्या नियुक्त्या तसेच नियंत्रण प्रक्रिया याची चर्चा केली जाणार आहे. बैठकीला (meeting) कोल्हापूर, सांगली आणि सातार्याच्या जिल्हाधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहतील.
या बैठकीत प्रत्येक राज्य आपल्या आराखड्याचे सादरीकरण करणार आहे. पूर नियंत्रणासाठी तसेच धरण व्यवस्थापनासाठी करण्यात येणार्या उपाययोजना, त्यांबाबत आवश्यक असणारी रेखांकने आदींसह आराखड्याची प्रत सादर करण्याचीही सूचना देण्यात आली आहे.
मुख्यमंत्रीही घेणार आढावा
या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचा आढावा घेणार आहेत. मान्सूनपूर्व तयारी आणि मान्सून काळातील तयारी याबाबत सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्याशी मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. ही बैठक मंगळवारी दुपारी होणार आहे.