महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा वाद पेटला

राज्यात पुढच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती (wrestling) स्पर्धा होणार आहेत. यासाठी पैलवानांनी तयारीही सुरू केली आहे परंतु आता महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे ठेवायच्या यावरून वाद सुरू झाला आहे. मागच्या 3 महिन्यांपूर्वी अध्यक्ष पदावरून वाद झाला होता आता पुन्हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे ठेवायच्या यावरून वाद सुरू झाला आहे. लांडगे गटाकडून या स्पर्धा नगरला जाहीर होताच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ मैदानात उतरले आहेत.

महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेवरून तडस गट आणि लांडगे गट असा वाद आहे. यावरून लांडगे गटाकडून 25 डिसेंबरला कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. लांडगे गटाकडून नगरमध्ये या स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. यामध्ये आमदार संग्राम जगताप यांनी नेतृत्व केले आहे.

दरम्यान या स्पर्धा पुण्यात व्हाव्यात यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये आता तडस गटाकडून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे दिल्लीला रवाना झाले आहेत. ते राष्ट्रीय कुस्ती (wrestling) संघाचे अध्यक्ष बृजभुषण सिंह यांची भेट घेत त्यांच्याकडून ठिकाण व तारखा निश्चित करून घेणार आहेत.

दरम्यान याबाबत येत्या 13 डिसेंबरला प्रेस घेऊन पुण्यातील स्पर्धेची तारीख जाहीर करणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितलं. याबाबत मुरलीधर मोहोळ यांची न्यूज18 लोकमतला exclusive माहिती दिली आहे.

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर लांडगे गटाच पारडं जड

रेसलिंग फेडरेशन ॲाफ इंडियाने तीन जणांची ॲडॲाफ कमिटी कुस्तीगीर परिषदेवर नेमली होती ती अयोग्य असल्याची याचिका कुस्तीगीर परिषदेच्या लांडगे गटाने उच्च न्यायालयाकडे केली होती. उच्च न्यायालयाने लांडगे गटाचे हे म्हणणं मान्य केल आहे. दरम्यान रेसलिंग फेडरेशनने कुस्तीगीर परिषदेची संलग्नता रद्द केली आहे.

कुस्तीगीर परिषदेत उभी फूट पडली

बाळासाहेब लांडगे गट आणि रामदास तडस यांचे गट आमचाच गट खरा असा दावा करू लागले आहेत. दोन्ही गटांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची घोषणा केली. यावरून नवा वाद सुरू झाला आहे. लांडगे गटाने अहमदनगरला राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने तर तडस गटाने मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने पुण्यात महाराष्ट्र केसरी घेणार असल्याच जाहीर केले. मात्र लांडगे गटाकडून तडस गटाला महाराष्ट्र केसरी हे टायटल वापरता येणार नाही असा दावा करण्यात आला आहे.

गुरुवारी नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शरद पवार यांना भेटून 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेत असल्याचे पत्र दिल. शरद पवार यांनी फायनल स्पर्धेसाठी उपस्थित राहण्यासाठी 31 तारखेला वेळ दिली असल्याची घोषणा केली. दरम्यान तडस गटाने तातडीने हालचाली करत पुन्हा तारखा निश्चित करून घेण्यासाठी रेसलिंग फेडरेशन ॲाफ इंडियाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना गळ घातली त्यासाठी मुरलीधर मोहोळ तातडीने दिल्ली ला रवाना झाले आहेत.

वादाचे मुद्दे काय आहेत ?

६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा नेमकी कोण घेणार ? कुस्तीगीर परिषद नेमकी कुणाच्या ताब्यात ? महाराष्ट्र केसरी च्या आधीच्या राजकीय परिस्थितीत लांडगे गट बाजी मारणार की तडस गट ?

पडद्यामागे काय घडतंय ?

शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांच्या मध्यस्थीने लांडगे गटाचे आणि तडस गटाचे कार्यकर्ते मिळून कुस्तीगीर परिषद चालवतील असा मध्य मार्ग 19 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत काढण्यात आला होता. त्यानंतर रेसलिंग फेडरेशन संलग्नता कायम ठेवेल असं ठरलं होत मात्र उच्च न्यायालयाचा आदेश आणि कायदेशीर पेच कायम असताना दोन्ही गटानी पुन्हा केसरी स्पर्धेसाठी उचल खाल्ल्याने वाद उफाळून आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *