देशातील चार राज्यांमध्ये लागू झालेला ‘हा’ कायदा महाराष्ट्रात येण्याची शक्यता
भाजपशासित पाच राज्यांमध्ये लव्ह जिहाद कायदा (Law) लागू आहे. श्रद्धा मर्डर केसनंतर पु्न्हा या कायद्याची चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्रात हा कायदा आणण्यासाठी हालचाली सुरु झालेल्या असून त्यासाठी समितीदेखील गठीत करण्यात आलेली आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये लव्ह जिहादविरोधी कायद्याचा प्रस्ताव येऊ शकतो.
लव्ह जिहादचा कायदा उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लागू आहे. उत्तर प्रदेशात २०२०मध्ये पहिल्यांदा कायदा लागू झाला.
आफताब पूनावाला याने श्रद्धा वालकरचा खून करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. या घटनेने देश हादरुन गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लव्ह जिहाद या कायद्याविषयी चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रात हा कायदा (Law) येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काल श्रद्धा वालकरच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन धर्मजागरण गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यासोबत भाजप नेते किरीट सोमय्या यांचीही उपस्थिती होती. एकूणच सध्या लव्ह जिहाद प्रकरणावरुन वातावरण तापण्याची शक्यता आहे.
कायदा मोडल्यास काय?
उत्तर प्रदेशमध्ये या कायद्यांतर्गत १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. या कायद्यामध्ये केवळ लग्नासाठी केलेलं धर्मांतर अमान्य आहे. खोटं बोलून, धोका देऊन झालेलं धर्मांतर हा गुन्हा आहे. ज्या प्रकरणामध्ये स्वेच्छा धर्मांतर करावयाचे आहे त्या प्रकरणात दोन महिने अगोदर मॅजिस्ट्रेटना माहिती द्यावी लागेल. या गुन्ह्यांतर्गत १५ हजार रुपयांच्या दंडासह एक ते पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.