आंब्यासाठी जूनपर्यंत पहावी लागेल वाट
पावसाळी हंगामातील परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याने आंबा पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच उशिराने आंब्याच्या झाडांना मोहोर आल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. जिल्ह्यात यावर्षी परतीच्या पावसाने नोव्हेंबर अखेरीस आणि डिसेंबरच्या सुरवातीस हजेरी लावल्याने शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशातच परतीच्या पावसाचा कालावधी यावर्षी वाढल्याने याचा परिणाम आंबा फळपिकांवर होण्याची शक्यता आहे. आंबा पिकाला उशिरा मोहोर येऊन आंबा उत्पादन जून महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली
दरवर्षी निसर्गाचा वाढत चालेला लहरीपणा, तसेच लांबत असलेला पाऊस, त्यामुळे वातावरणात होणारा बदल यांचा परिणाम हंगामी पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. साधारणपणे सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरवात होते, मात्र यावर्षी पावसाने नोव्हेंबर -डिसेंबर जानेवारीपर्यंत हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांची अवस्था नाजूक झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडीला सुरवात होऊन आंबापिकाला मोहोर येण्यास सुरवात होत असते. मात्र, यावर्षी नोव्हेंबरमध्ये पाहिजे तेवढी थंडी नसल्याने आंब्याच्या झाडांना उशिराने मोहोर येण्याची शक्यता आहे. परिणामी आंबा हंगाम लांबणार आहे. त्यामुळे आंबे तयार होण्यास जून उजाडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.