महाराष्ट्रात सत्तांतराची भाषा करणाऱ्या फडणवीसांना भुजबळांचा सणसणीत टोला

राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा विश्वास कमालीचा वाढला असून महाराष्ट्रातील सत्तांतराचे दावे केले जात आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पुढचं सरकार भाजपचंच असेल, असा दावा केला आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यावर बोलताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टोला हाणला आहे.
नाशिकमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. ‘महाराष्ट्रात भाजपचं सरकार येईल असं त्यांचे नेते म्हणत असतील तर ठीक आहे. पण त्यासाठी त्यांना अडीच वर्षे थांबावं लागेल. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील, तेव्हा कळेलच. आता तरी तशी कुठलीही परिस्थिती नाही,’ असं भुजबळ म्हणाले. ‘चार राज्यांत भाजपचा विजय झालेला आहे हे आम्हाला मान्य आहे. पण भाजपची सत्ता आली असली तरी एकट्या उत्तर प्रदेशात भाजपचे ५० हून अधिक आमदार कमी झाले आहेत. शरद पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे विरोधक वेगवेगळे न लढता एकत्र लढले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं. भाजपची लाट ही कमी होताना दिसत आहे. गोव्यात भाजपचे सगळे विरोधक वेगवेगळे लढले. तिथं मतांचं मोठ्या प्रमाणावर विभाजन झालं, त्याचा फायदा भाजपला झाला,’ असंही भुजबळ म्हणाले. ‘राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीचे लोक कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करू,’ असंही त्यांनी सांगितलं.’विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी राज्यपालांना विनंतीपत्र पाठवलं आहे. त्यांनी आदेश दिला की लवकरात लवकर निवड होईल. उच्च न्यायालयानंही याबाबत लवकर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत,’ याकडं भुजबळ यांनी लक्ष वेधलं.
‘ओबीसी आरक्षण संदर्भात बांठीया कमिशन नेमण्यात आलं आहे. या कमिशननं काम देखील सुरू केलं आहे. येत्या दोन महिन्यांत त्याचं काम पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. राज्य सरकार प्रभाग रचना तयार करून निवडणूक आयोगाला देईल. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक ठरवावी, असं भुजबळ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *