आज बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंनाही तोच सल्ला दिला असता
‘शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या राजवटीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बोलघेवडेपणाबद्दल तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना खडसावले होते. दोन वर्षे केवळ घोषणाबाजी केल्यानंतर, आता घोषणा पुरेत, कामाला लागा, असा जाहीर सल्ला बाळासाहेबांनी जोशी यांना दिला होता. आज बाळासाहेब असते, तर तोच सल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला असता, अशा शब्दांत भाजपनं मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं. ‘सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे यांनी गेली अडीच वर्षे टोमणे मारणे, कोट्या करणे यातच वेळ वाया घालवला आहे. पण टोमणे ऐकत करमणूक करून घेण्याची महाराष्ट्राच्या जनतेची सहनशीलता आता संपली असून समस्यांना तोंड देताना जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळं कामाला लागा आणि समस्या सोडवा, असा सल्ला उपाध्ये यांनी दिला आहे. ‘एसटी संप, मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण याबाबत मुख्यमंत्री चकार शब्द उच्चारत नाहीत. गेल्या अडीच वर्षांत नाकर्त्या सरकारमुळे महाराष्ट्राची सर्व क्षेत्रांत नाचक्की झाली. विकासाची कामे ठप्प झाली. खंडणीवसुली, खून, बलात्कार, भ्रष्टाचाराची पाळेमुळे थेट मंत्रालयात घुसली. मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या गोतावळ्याने या कोंबडीला कसे लुटले ते जाधव यांच्या पराक्रमातून जनतेसमोर आलं आहे. मातोश्रींना दोन कोटी रुपयांची रोकड आणि पन्नास लाखाचे महागडे घड्याळ भेट देणाऱ्या यशवंत जाधव यांच्या अफरातफरीच्या कारवाया जगासमोर उघड होऊनही मुख्यमंत्री मूग गिळून गप्प का, असा सवालही उपाध्ये यांनी केला. या प्रकरणातील यशवंत जाधव यांच्या कथित ‘मातोश्री’चीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.
‘गेल्या अडीच वर्षांत ठाकरे सरकारनं जनतेची एकही समस्या सोडविली नाही. राज्यात भ्रष्टाचार, गुंडगिरी, बोकाळली. महिलांवरील अत्याचार वाढले. सामान्य कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली. शेतकऱ्याना नैराश्य आले. आत्महत्या वाढल्या. अशा भीषण परिस्थितीत मुख्यमंत्री पांचट विनोदातून जनतेची करमणूक करण्याचा प्रयत्न करीत समस्यांपासून लक्ष विचलित करण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहेत, असा आरोप उपाध्ये यांनी केला.