शरद पवारांच्या दबावासमोर झुकू नका, ठाम भूमिका घ्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यासाठी ठामपणे भूमिका घ्यावी. त्यांनी शरद पवार यांच्यासमोर झुकू नये. उद्धव ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतल्यास भाजप कुठलेही आढेवेढे न घेता किंवा कुठल्याही अटींशिवाय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला पाठिंबा देईल, असे वक्तव्य भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केले. नवाब मलिक यांच्या अंडरवर्ल्डशी असणाऱ्या कथित संबंधांबाबत भाष्य करताना आशिष शेलार यांनी हे विधान केले. उद्धव ठाकरे यांनी देशहितासाठी ताठ मानेने उभे राहावे. दाऊद गँगमधील लोक आणि त्यांच्याशी कनेक्शन असणाऱ्या राजकीय व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत. शरद पवार यांच्या दबावाला बळी पडू नये. नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातू हकालपट्टी करावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाविकासआघाडीतील तीन पक्षांपैकी दोन पक्ष वाया गेले आहेत. त्यामुळे आमची अपेक्षा केवळ उद्धव ठाकरे यांच्याकडूनच आहे. येत्या अधिवेशनात उद्धव ठाकरे नवाब मलिक यांच्यासंदर्भात काही बोलतील, अशी आशा आहे. आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका घेतल्यास भाजप त्याला पूर्णपणे पाठिंबा देईल, असे आशिष शेलार यांनी जाहीर केले.
तसेच नवाब मलिक यांची अटक ही राजकीय हेतूने झाल्याचा अपप्रचार होत असल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला. याप्रकरणात पहिला गुन्हा २०१७, दुसरा गुन्हा २०१९ आणि तिसरा गुन्हा ३ फेब्रुवारी २०२२ रोजी दाखल झाला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल दाऊद , छोटा शकील, जावेद चिकणा आणि टायगर मेमन यांच्याविरुद्ध एफआयर नोंदवला होता. त्यानंतर ईडी आणि एनआयए यांची संयुक्त चौकशी सुरु झाली. मग आता त्याला राजकीय अटक का म्हटले जात आहे, असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला. यावेळी आशिष शेलार यांनी संजय राऊत यांनाही टोला लगावला. उखाड दिया लिहणारे केवळ शब्दशूर आहेत. पण २०१७ पासून भाजपने दाऊदची पाळेमुळे उखाडायला सुरुवात केली. त्यामुळे संजय राऊत हे केवळ शब्दशूर आहेत, पण भाजप निर्णयशूर आहे. निर्णयशूर कसे व्हायचे, याचे ट्रेनिंग आम्ही बोरूबहाद्दरांना द्यायला तयार आहोत, असेही आशिष शेलार यांनी म्हटले.
राज्य सरकारला कोणत्या विषयाला प्राथमिकता द्यायची, हेच समजत नाही. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाकडे सुरुवातीला राज्य सरकारने दुर्लक्ष केले. पण नवाब मलिकांच्या समर्थनार्थ महाविकासआघाडीचे नेते लगेच एकत्र जमले. संभाजीराजे यांची प्रकृती उपोषणामुळे ढासळली, याकडे राज्य सरकारचे लक्ष नव्हते. पण नवाब मलिक यांच्या पोटात दुखायला लागल्यावर लगेच सगळ्या हालचाली झाल्या. त्यामुळे आता महाराष्ट्रात विशिष्ट आडनावाच्या, धर्माच्या किंवा जातीच्या व्यक्तींनाच अधिक महत्त्व आले आहे का, असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
लवासा प्रकल्पाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने अनेक निष्कर्ष आणि निरीक्षणे नोंदवली आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना याविषयी माहिती असेल तर त्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी. लवासा प्रकल्प राजकीय मनमानी आणि प्रशासकीय हलगर्जीपणा असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले. त्यामध्ये पवार कुटुंबीयांचा सहभाग असल्याचेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. यावर आदित्य ठाकरे यांनी बोलावे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.