कृषीप्रधान महाराष्ट्र सरकारला लकवा मारलाय का?, राजू शेट्टी संतापले
मागील काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetty) स्वत: मैदानात उतरले आहेत. १५ फेब्रुवारीपासून महावितरण (MahaVitaran) कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरूच आहे. मात्र सरकार यावर कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने त्यांनी सतंप्त प्रतिक्रिया दिली आहे. एक ट्विट करत त्यांनी महाराष्ट्र सरकारवर (Maharashtra Govt.) हल्लाबोल केला आहे.
ते म्हणतात, तेलंगणा शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज देते. कर्नाटक (Karanatka) दिवसा ७ तास मोफत वीज देते. राजस्थानने शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला आहे, मग कृषीप्रधान महाराष्ट्र सरकारला काय लकवा मारलाय काय?, असा संतप्त सवाल त्यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे.दरम्यान, दहा दिवस वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. राज्यसरकारला जाग यावी यासाठी राजू शेट्टी यांनी या काळात राज्यभर रस्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेधही केला आहे. त्यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या संदर्भातील वक्तव्यांचाही खरपूस समाचार घेतला आहे. आता यानंतर त्यांच्या मागण्यांवर महाराष्ट्र सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.