एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचे लेखी आश्वासन
‘गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर (strike) ठाम आहेत. संपावर असल्याने या कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. ३१ मार्चपर्यंत संपकरी कर्मचारी कामावर रुजू झाल्यास त्यांना त्याच दिवसापासून सुधारित अर्थात वाढीव पगार देण्यात येईल,’ असे लेखी आदेश एसटी महामंडळाने काढले आहेत.
एसटी संपकरी कर्मचाऱ्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात असून कोणाचीही नोकरी जाणार नाही, असे स्पष्ट करून ३१ मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन परिवहनमंत्री आणि एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले. या आवाहनाला अवघे २४ तास बाकी असताना अद्याप जवळपास ६० हजार कर्मचारी संपावर (strike) ठाम आहेत. यात १० हजार बडतर्फीची कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जे संपकरी कामावर ३१ मार्चपर्यंत कामावर हजर होतील, त्यांनाच पुनर्नियुक्तीच्या तारखेपासून सुधारित पगार देण्यात येणार आहे. यामुळे मोठ्या संख्येने संपकरी कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामावर रुजू व्हावे आणि एसटी सेवा पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू करावी, असे आवाहन ही एसटी महामंडळाने केले आहे.
महामंडळाचे आदेश
– संपकऱ्यांना एक एप्रिलपासून पुनर्नियुक्ती देतानाच ते ज्या पदावर आहेत, त्याच पदावर नियुक्त करण्यात येईल.
– नवनियुक्ती ते दहा वर्षे आणि त्यामधील कर्मचाऱ्यांना पाच हजार, १० वर्षे ते २० वर्षांपर्यंत चार हजार आणि २० वर्षे सेवा झालेल्या व २० वर्षांपेक्षा जास्त वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपयांची तत्काळ वाढ
– मे महिन्यात सुधारित पगार देण्यात येईल. त्यामुळे कामगारांना लाभ