मुख्यमंत्री -गृहमंत्री यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला ४ मे रोजीचा अल्टीमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि पदाधिकारी यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान, राज्यातील कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी गृहमंत्री दिलीप -वळसे पाटील यांनी पोलीस विभागाला सक्त सुचना दिल्या दिल्या आहेत. तर गृहमंत्री वळसे-पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आज (दि.३) दुपारी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हेदेखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
दरम्यान, “कायदा व सुव्यवस्था हातळण्यास पोलीस सक्षम आहेत. समाजकंटकांवर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यात त्यांच्यावर कारवाई केली जाईल. राज्याने शांतता पाळण्यात यावी”, असे आवाहन पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी केले आहे.
गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस महासंचालक रजनीश सेठ बोलत होते. ते म्हणाले की, “राज्यात एकोपी जपला पाहिजे. गृहमंत्र्यांनी आढावा बैठक घेतलेली आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास केलेला आहे. आवश्यकता वाटल्यास आजच राज ठाकरेंवर पोलीस कारवाई करतील. कोणीही कायदा हातात घेऊ नये अन्यथा कडक कारवाई केली जाईल”, अशीही माहिती पोलीस महासंचालक यांनी दिली आहे.