मंत्रालय अखेर निर्बंधमुक्त; १८ पासून सामान्यांना प्रवेश
राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध (restriction) पूर्णत: हटविलेले असतानाही राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयात सामान्य माणसांना अजूनही प्रवेश मिळत नव्हता. मात्र, आता १८ मे पासून हा प्रवेश देण्याचा निर्णय गृह विभागाने सोमवारी घेतला. मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्वी असलेली व्हीआरएमएस (व्हिजिटर पास मॅनेजमेंट सिस्टीम) १८ तारखेपासून पुन्हा लागू केली जाईल.
सामान्यांना मंत्रालयात प्रवेश दिला जात नसल्यामुळे येत असलेल्या अडचणींकडे लोकमतने लक्ष वेधले होते. त्यावर, मंत्रालय प्रवेशावरील निर्बंध (restriction) हटवावेत आणि सामान्यांना प्रवेश द्यावा यासाठीचा प्रस्ताव आपल्या विभागाकडून पाठविला जाईल, अशी ग्वाही सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी दिली होती.
प्रस्ताव गृह विभागाने मंजूर केला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील त्यास मान्यता दिली आहे. आता मंत्रालयाच्या गेटवर पास तयार करून सामान्यांना मंत्रालयात जाता येईल.