पालकांच्या खिशाला मोठा फटका
राज्यातील शाळा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला असताना शालेय साहित्यांपैकी वह्या आणि पुस्तकांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी हे भाव आणखी वाढण्याची (increase) शक्यता असल्याने त्याचा फटका कोट्यवधी पालकांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनानंतर देशातील कागद कंपन्यांकडील उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यांनी कागदाचे भावही वाढविल्याने वह्यांच्या किंमतीही वाढल्या असल्याचे सांगण्यात आले. ही वाढ मागील तीन महिन्यांत ४५ टक्क्यांपर्यंत येऊन पोहोचली असल्याचे मुंबईतील अब्दुल रहेमान स्ट्रीट येथील शालेय साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सांगितले.
राज्यात वह्या आणि इतर कामकाजासाठी वेस्टकोस्ट, एनपीएल, बल्लारपूर पेपर आणि सेंच्युरी पेपर मिलच्या माध्यमातून वह्या आणि पुस्तकांसाठी कागदाचा पुरवठा केला जातो. दोन महिन्यांपूर्वी कागदाचा भाव ५५ हजार रुपये टन होता तो आता टनामागे ८५ हजार रुपयांवर गेले आहेत. पेपर मिलकडून एक हजार टन कागदाची मागणी करण्यात आली आहे. परंतु ३०० टन एवढाही कागद उपलब्ध होत नसल्याने बाजारात वह्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता महाराष्ट्र बुक मॅन्युफॅक्चर संघटनेचे अध्यक्ष अमृता शहा यांनी व्यक्त केली.
दीड महिन्यांपूर्वी ४८० ते ५५० रुपये प्रतिडझनने मिळणाऱ्या नामांकित कंपन्यांच्या वह्या आज ६५० ते ७०० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. ए-फोर, लाँगबुकचे भावही ३०० ते ७०० रुपयांवर गेले आहेत. किरकोळ बाजारात वाढीव (increase) दराने या वस्तूंची विक्री होत आहे.
– महेंद्र जैन, वह्यांचे होलसेल विक्रेते
सिमेंट, स्टीलचे भाव वाढल्यास सरकारचे लक्ष जाते परंतु प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आवश्यक वह्या-पुस्तकांच्या पेपरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असूनही त्याकडे सरकार आणि इतर कोणत्याही यंत्रणेचे लक्ष का जात नाही.