देवेंद्र फडणवीसांची चौकशी, माजी विरोधी पक्ष नेते म्हणाले…

‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. मात्र, विरोधी पक्षनेत्याला अशी नोटीस पाठविणे आणि चौकशी करणे म्‍हणजे त्‍यांच्‍या विशेष आधिकारांवरच गदा आणण्‍यासारखे आहे. यावर सामान्‍य प्रशासन विभाग एवढा अंधारात कसा?,’ असा सवाल माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांना पाठविलेली नोटीस आणि त्यानुसार चौकशीसंबंधी भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. याविरोधात आंदोलनेही झाली. यामध्ये पूर्वीच्या सरकारच्या काळात विरोधी पक्ष नेते राहिलेल्या विखे पाटील यांची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरते. फडणवीस मुख्यमंत्री असताना विखे पाटील काँग्रेसमध्ये होते आणि ते विधानसभेतील विरोधीपक्ष नेते होते. विशेष म्हणजे त्या काळात विखे पाटील यांनी तत्कालीन सरकारवर सतत आरोपांची राळ उठविली होती. तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध विखे पाटील यांनी अनेक आरोप केले होते. खडसे यांनी दाऊदला दूरध्वनी केल्याचे कथित प्रकरण त्या काळात पुढे आले होते. तेही विखे पाटील यांनी विरोधीपक्ष नेते या नात्याने उचलून धरले होते. एवढेच नव्हे तर तत्कालीन सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना त्यासंबंधी काही कागदपत्रांचे प्रदर्शनही विखे पाटील यांनी भरविले होतेया पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी आताच्या विरोधी पक्ष नेत्यांविरुद्धच्या कारवाईवरून सध्याच्या सरकारवर टीका केली आहे. विखे पाटील यांनी म्हटले आहे, राज्‍यातील बदल्‍यांसंदर्भात भ्रष्‍टाचार उघड केल्‍याबद्दल पोलिसांनी दिलेली नोटीस म्‍हणजे चोराच्‍या उलट्या बोंबा अशीच परिस्थिती आहे. भ्रष्‍टाचाराच्‍या विरोधातील लढाईत फडणवीसांच्‍या पाठीशी भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांसह राज्‍यातील जनता खंबीरपणे उभी राहील. महाविकास आघाडी सरकारच्‍या भ्रष्‍टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्‍यासाठीची लढाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. एकापाठोपाठ एक मंत्री तुरुंगात जात आहेत. आणखी किती मंत्र्यांचे नंबर आहेत माहीत नाही. त्‍यामुळे सैरभैर झालेल्‍या महाविकास आघाडी सरकारच्‍या नेत्‍यांनी जाणीवपूर्वक फडणवीस यांना लक्ष करून, त्रास देण्‍याचा प्रयत्‍न सुरू केला आहे. या लढाईत संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्‍यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे असल्‍यामुळे महाविकास आघाडीचे मनसुबे यशस्‍वी होणार नाहीत. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्‍या भ्रष्‍टाचाराची प्रकरणे यापुढेही बाहेर काढणार आहोत. भ्रष्‍टाचाराच्‍या विरोधातील या लढाईपासून भाजप कदापिही मागे हटणार नाही, असेही विखे पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *