पावसाळ्यात केस गळतीची समस्या? हजारो खर्च करण्यापेक्षा करा ‘हा’ घरगुती उपाय
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/09/612081-mansoon-hair-problem.jpg?im=FitAndFill=(1200,900))
पावसाळ्यात सर्दी-पडस्या व्यतिरिक्तही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बदलत्या हवामानामुळे लोक आजारी पडतात, तर दुसरीकडे कीटक वाढल्याने जीवघेणे आजारही उद्भवतात. पावसाळ्यात हवेत ओलावा असतो त्यामुळे केसांना (hair) कोरडेपणा आणि खाज येण्याची समस्या देखील सुरु होते. यातूनच केस गळण्याची समस्याही पावसाळ्यात सुरू होते. केस गळती सुरु झाल्यावर महिला टीव्हीवर दिसणाऱ्या जाहिराती आणि कोणी सुचवलेल्या प्रोडक्टवर हजारो रुपये खर्च करतात. पण काही परिणाम न दिसल्याने पैसे खर्चून वाया गेल्याची त्यांची भावना होते.
पावसाळ्यात केसांची अतिरिक्त काळजी घेण्याची गरज असते. त्यामुळे केसांची काळजी घेण्याचा घरगुती उपाय जाणून घेऊया. केळी आणि मधाचा उपयोग करुन तुम्हाला तुमच्या केसांची निगा सहज राखता येईल.
पावसाळ्यासाठी केळी आणि मध हेअर मास्क
केळी आणि मधामध्ये दही आणि खोबरेल तेल मिसळून हेअर मास्क तयार करता येऊ शकेल. केळ्यामध्ये असलेली जीवनसत्त्वे, खनिजे आणि नैसर्गिक तेले केसांना (hair) मॉइश्चरायझ करतात. केळ्यामुळे केस मऊ होतात आणि त्यांची चमक वाढते. मधामध्ये असलेले गुणधर्म केसांचा कोरडेपणा कमी करतात आणि केसांमध्ये आर्द्रता टिकवून ठेवतात. दह्याचे लॅक्टिक अॅसिड आणि खोबरेल तेलाचे गुणधर्मही केसांसाठी खूप चांगले असतात.
केळी आणि मध हेअर मास्क कसा बनवायचा?
हेअर मास्क बनवण्यासाठी १ केळी, १ चमचा मध, २ चमचे दही आणि खोबरेल तेल घ्या.
एका भांड्यात केळी मॅश करून पेस्ट बनवा.
केळी मॅश केल्यानंतर त्यात मध, दही आणि खोबरेल तेल मिसळा. नीट मिसळल्यानंतर ओल्या केसांना लावा.
हे सर्व केसांवर मुळे आणि शेवटपर्यंत लावा आणि केसांना हेअर मास्कने पूर्णपणे झाकून टाका.
चांगले मसाज केल्यानंतर अर्धा तास केस असेच राहू द्या
नियमित शॅम्पूने केस स्वच्छ करा. असे केल्याने केस गळणे कमी होईल.