‘बोलवता धनी कोण?..’, ‘त्या’ भेटीत जरांगेंशी काय बोललो? शरद पवारांनी सर्वच सांगितलं…
मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्यामागे कोण आहे हे लवकरच कळेल असे फडणवीस म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या एसआयटी चौकशी केली जाणार आहे. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मनोज जरांगे तुम्ही दिलेली स्क्रिप्ट बोलतायत असा आरोप (alligation) शरद पवारांना केला जातोय. जरांगेंचे उपोषण सुरु झाल्यानंतर त्यांना भेटायला मी गेलो होते. 2 समाजात अंतर वाढेल असे काही करु नका. महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा राहील याची काळजी घ्या. तुमची भावना मी समजू शकतो. त्यानंतर आजपर्यंत मी एका शब्दाने त्यांच्याशी मी बोललो नाही किंवा भेटलो नाही. त्यामुळे हे आरोप बिनबुडाचे असल्याचे पवार म्हणाले.
राजेश टोपे यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवरदेखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजेश टोपे यांच्यावरील आरोप (alligation) शंभर टक्के खोटे आहेत, असे ते म्हणाले. जबाबदार लोकांकडून इतकं पोरकट वक्तव्य येईल असे वाटले नाही, असे ते म्हणाले.
काही लोकांवर दबाव टाकला जातोय. शासकीय सेवेत काम करणाऱ्यांना नोकरीवर नका येऊ अशी धमकी दिली जातेय. दमदाटी करत असेल तर आम्ही सर्व त्या कार्यकर्त्यांच्या मागे भक्कम उभे राहू. तुम्ही चिंता करु नका, असे आवाहन त्यांनी केलंय.
मनोज जरांगे पाटील यांची SIT चौकशी लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. यावर पवार म्हणाले, एसआयटी नेमा की आणखी काही नेमा. कर नाही त्याला डर कशाला? असे पवार म्हणाले.
मनोज जरांगे पाटलांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी देणार असे विधान आशिष देशमुख यांनी केले होते. हे वृत्तदेखील शरद पवारांनी फेटाळले. काही पक्षांकडून दम देण्यात येत आहे, सरकारी निमसरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत अशा तक्रारी आहेत.