सामूहिक विवाहात जोडप्यांना मिळणार २५ हजार रुपये
![](https://d2n2y7fp2ncdvv.cloudfront.net/files/2023/06/26123119/child-marriage-beed.jpg)
राज्यातील वाढती महागाई लक्षात घेऊन शुभमंगल सामूहिक विवाह योजनेच्या (Mass Marriage Scheme) अनुदानात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार या विवाह योजनेतील जोडप्यांना आता २५ हजार रूपये देण्यात येणार आहेत. तर सामूहिक विवाह राबवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना २ हजार ५०० रूपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
महिला व बाल विकास विभागामार्फत सामूहिक विवाह योजना (Mass Marriage Scheme) राबवली जाते. या योजनेत शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील तसेच निराधार, परित्यक्ता आणि विधवा महिलांच्या दोन मुलींच्या विवाहाकरता या योजनेत सहभागी होता येते. या जोडप्यांना १० हजार रूपये तर सामूहिक विवाह राबवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना २ हजार रूपये देण्यात येत होते. मात्र, गेल्या दहा वर्षांतील महागाईचा विचार करून या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. हे अनुदान डीबीटी पद्धतीने थेट खात्यात जमा होईल.