द्रविड घेणार पंतची ‘शाळा’, खराब खेळाबद्दल केले मोठे वक्तव्य

(sports news) टीम इंडियाने 2021 चा शेवट विजयाने केला होता. पण, 2022 ची सुरूवात पराभवाने झाली आहे. जोहान्सबर्गमध्ये भारतीय टीमनं यापूर्वी एकही टेस्ट मॅच गमावली नव्हती. त्याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियाला (India vs South Africa) 7 विकेट्सनं पराभूत केले. टीम इंडियाला दोन्ही इनिंगमध्ये मोठा स्कोअर करता आला नाही. टीम इंडियाच्या या पराभवानंतर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) खेळावर टीका होत आहे. पंत दुसऱ्या इनिंगमध्ये टीमला गरज होती, त्यावेळी बेजबाबदार फटका मारून आऊट झाला होता. आता पंतच्या खेळावर टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

ऋषभ पंत (Rishabh Pant) जोहान्सबर्ग टेस्टमध्ये तिसऱ्या दिवशी बॅटींगला उतरला त्यावेळी टीम इंडियाची अवस्था 4 आऊट 163 अशी होती. पुजारा आणि रहाणे जोडी आऊट झाली होती. त्यावेळी टीम इंडियाला भागिदारी गरज होती. पंतने परिस्थितीचे भान ओळखून संयमी सुरूवात करणे आवश्यक होते. पण, तो बेजाबदार फटका मारून आऊट झाला. पंतची ही चूक टीम इंडियावर भारी पडली.

राहुल द्रविडनं मॅचनंतर पत्रकार परिषदेत या विषयावर बोलताना सांगितले की, ‘ऋषभ सकारात्मक खेळतो आणि खास पद्धतीने बॅटींग करतो हे आपल्याला माहिती आहे. या पद्धतीने बॅटींग करून त्याला यश देखील मिळाले आहे. पण, आम्ही नक्कीच पंतशी चर्चा करू. त्या पद्धतीचा फटका मारण्याची वेळ आणि मॅचमधील परिस्थितीवर ही चर्चा होईल.’ (sports news)

‘तो’ सल्ला नाही

द्रविड पुढे म्हणाला की, ‘कुणीही ऋषभ पंतला तू आक्रमक किंवा सकारात्मक खेळू नकोस हा सल्ला देणार नाही. पण, कधी-कधी या पद्धतीने खेळण्यासाठी वेळेचे भान जपणे आवश्यक असते. माझ्या मते मैदानात गेल्यावर थोडा वेळ तिथं खेळून काढणे अधिक योग्य आहे. पण, ऋषभमुळे टीमचा फायदा काय होतो हे सर्वांना माहिती आहे. तो आमच्यासाठी काही वेळात मॅचचं चित्र बदलू शकतो. त्याला नैसर्गिक खेळाला मुरड घालून वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा सल्ला देता येत नाही. पण, एक बॅटर म्हणून प्रतिस्पर्धी टीमवर आक्रमक खेळ कधी करायचा हे समजणे आवश्यक आहे.’ असे द्रविडने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *