सांगली : भरधाव कार पलटी झाल्याने दाम्पत्य जागीच ठार

दिंडीतून निघालेल्या वारकऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव निघालेली कार ढिगाऱ्यावर जाऊन पलटी झाली. यात पृथ्वीराज चव्हाण व प्रियांका पृथ्वीराज चव्हाण (रा. कसबेडिग्रज) हे दांपत्य जागीच ठार झाले. तर कारमधील आणखी चार जण जखमी आहेत.

ही घटना मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय मार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ घडली. सांगलीहून बीडला नातेवाईकांकडे जाताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. चव्हाण कुटुंबीय (कार क्र.के. ए.२३ एन ७०७४ ) ने बीडला नातेवाईकांकडे निघाले होते.
दरम्यान, विठ्ठलवाडीजवळ पंढरपूरला निघालेल्या दिंडीतील वारकरी भरधाव कारच्या आडवा आल्याने त्याला वाचवण्यासाठी कारचालकाने कार रस्त्यावरील ढिगाऱ्यावर घातली. भरधाव कार ढिगाऱ्यावरून पंधरा फूट उडून पुढे रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. पृथ्वीराज चव्हाण व प्रियांका चव्हाण जागीच ठार झाले. यात आणखी चार जण जखमी झाले आहेत. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनास्थळी भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *