महिलांची डोंगरात वणवण सुरू
उन्हाच्या तडाख्यामुळे मार्चमध्येच डोंगरी वाडीवस्तीवर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. उपवडेपैकी तांबोळकरवाडीत तीव्र पाणीटंचाई (Water scarcity) निर्माण झाली असून, झरा आटल्याने महिलांची डोंगरात पाण्यासाठी वणवण सुरू आहे. करवीर तालुक्यातील पश्चिमेकडील बारा वाड्या वस्त्यांचा हा परिसर आहे. उपवडेपैकी तांबोळकरवाडी सुमारे २५० लोकवस्तीची वाडी आहे.
उंच डोंगरात ही वस्ती वसलेली असून, झऱ्याच्या पाण्याचा येथील नागरिकांना आधार आहे. यापूर्वी २५ लाखांच्या आणि पाच लाखांच्या अशा दोन योजनेच्या निधीतून डोंगरातून झऱ्याचे पाणी दोन टाकीत आणून साठवले जाते. आणि या ठिकाणाहून या वस्तीला पाणी पुरवले जाते, मात्र यावर्षी उन्हाळ्यापूर्वीच झरा आटला आहे, यामुळे तीव्र पाणीटंचाई (Water scarcity) जाणवू लागली आहे. पंचायतीच्या वतीने टाकीत साठलेले पाणी पिण्यासाठी दोन-चार घागरी दोन-तीन दिवसांतून सोडले जाते.
ग्रामपंचायतीतर्फे सरपंच पांडुरंग पोवार यांनी वस्तीवर भेट दिली. यावेळी ग्रामस्थ अंबाजी तांबोळकर, रामचंद्र पाचाकटे, प्रल्हाद सुतार, आनंदा तांबोळकर, संजय तांबोळकर, नामदेव कासाटे, बाळू भोसले, शिवा पाचाकटे यांनी अडचणी मांडल्या. यावेळी नागरिकांनी पाण्याची शाश्वत योजना शासनाने करावी, अशी मागणी केली आहे.
वस्तीवर पाणीटंचाई झाली आहे, दोन-तीन दिवसांतून चार घागरी पाणी येते, झरा आटला आहे, धुणे धुण्यासाठी डोंगरातून पाणी शोधावे लागत आहे. जनावरांच्या आणि पिण्याचा पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.
– सविता तांबोळकर
झरा आटल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे, उपवडे तलावातून पाणी देण्याचे नियोजन आहे, मात्र खर्चिक असल्यामुळे यासाठी निधी मिळावा.