एशियन गेम्ससाठी भारताचा नवा कर्णधार, दिग्गज क्रिकेटरचं करिअर संपुष्टात?
![](https://images.news18.com/ibnlokmat/uploads/2023/07/ruturaj-gaikwad-and-shikhar-dhawan-16894054413x2.jpg?im=Resize,width=480,aspect=fit,type=normal)
(sports news) बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने 19 व्या एशियन गेम्स स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने 15 सदस्यीय मुख्य संघ जाहीर केला आहे. तर चौघांना राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी 14 जुलै रोजी रात्री उशिरा ट्विट करत याबाबतची माहिती दिली. या स्पर्धेसाठी आधी शिखर धवन याचं नावं आघाडीवर होतं. मात्र या स्पर्धेतच शिखर धवन याला संधी देण्यात आलेली नाही. टीम इंडियाचा युवा सलामीवीर पुणेकर ऋतुराज गायकवाड याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सोबतच बीसीसीआयने आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये रिंकू सिंह याच्यासह अन्य खेळाडूंचा समावेश आहे.ही स्पर्धा टी 20 फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे.
युवा खेळाडूंना संधी
वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन यंदा भारतात करण्यात आलंय. वनडे वर्ल्ड कप 2023 ला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होतेय. तर एशियन गेम्सचा 28 सप्टेंबरपासून श्रीगणेशा होतोय. त्यामुळे एशियन गेम्स स्पर्धेत बी टीम इंडिया सहभागी होणार आहे. या युवा टीम इंडियात रिंकू सिंह, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांचा समावेश आहे.
कुणाकडे कोणती जबाबदारी?
अर्शदीप सिंह, शिवम मावी, आवेश खान आणि मुकेश कुमार या चौघांकडे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. तर फिरकी गोलंदाजीची धुरा ही रवी बिश्नोई आणि शहबाज अहमद याच्यांकडे असेल. तसेच संघात ऑलराउंडर म्हणून वॉशिंग्टन सुंदर याला संधी दिली गेली आहे. (sports news)
एशियन गेम्स स्पर्धेत क्रिकेट सामन्यांचं आयोजन हे 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलंय. या स्पर्धेचं आयोजन हे चीनमध्ये करण्यात आलंय. एशियन स्पर्धेचं चीनमध्ये आयोजन करण्याची ही तिसरी वेळ आहे. तसेच या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्याची ही तिसरी वेळ आहे. एशियन गेम्समध्ये याआधी 2014 आणि 2010 मध्ये क्रिकेट खेळाला स्थान देण्यात आलं होतं.
19 व्या एशियन गेम्ससाठी टीम इंडियाची घोषणा
टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)
राखीव खेळाडू | यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन.