…तर टीम इंडिया थेट World Cup मध्ये पोहोचणार!

(sports news) वर्ल्ड कप 2023 मधील सेमी-फायलनचे संघ निश्चित झाले आहेत. पहिला सेमी-फायलनचा सामना भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होणार आहे. तर दुसरा सामना हा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणार आहे. पाकिस्तान सेमी-फायनलच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे. मात्र या चारही संघांपैकी 2 संघ थेट फायनलसाठी पात्र ठरु शकतात असं सध्याची स्थिती सांगत आहे. ते कसं हे पाहूयात..

पाकिस्तान बाहेर

पाकिस्तान आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यामध्ये नशिबानचे पाकिस्तानची साथ दिली नाही. सामन्यातील टॉस हा अत्यंत महत्त्वपूर्ण होता. कारण नेट रन रेटचा विचार करता पाकिस्तानला इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यामधून सेमी-फायनलसाठी पात्र होण्याच्या दृष्टीने प्रथम फलंदाजी करणं जास्त फायद्याचं ठरलं असतं. मात्र इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने नाणेफेक जिंकल्यानंतर खेळपट्टीवर हिरवळ अधिक असतानाही प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी पहिल्या 10 ओव्हरमध्येच पाकिस्तानी गोलंदाजीची पिसं काढली. आता पाकिस्तान सामना जिंकला तरी नेट रन रेटच्या जोरावर त्यांना न्यूझीलंडच्या वरचढ होता येणार नाही.

पाकिस्तानी संघ सेमी-फायलनमध्ये पात्र ठरण्याची शक्यता अगदी 0.01 टक्के होती. मात्र टॉस जिंकून जॉस बटलरने प्रथम फंलदाजीचा निर्णय घेणे आणि त्यानंतर इंग्लडचे सलामीवीर जॉनी बेस्ट्रो आणि डेव्हिड मिलान यांनी केलेल्या तुफानी खेळीमुळे पाकिस्तानचा सेमी-फायनलमधील पत्ता कट झाला आहे. पाकिस्तानने आधी क्षेत्ररक्षण केल्यास त्यांना नेट रन रेटमध्ये न्यूझीलंडला पराभूत करणं अशक्य असल्याची चर्चा सामन्याच्या आधीपासूनच होती. आता इंग्लंड प्रथम फलंदाजी करताना जो काही स्कोअर करेल ते टार्गेट पाकिस्तानला अशक्य वाटेल अशा रनरेटने पूर्ण करावं लागेल. म्हणजे पहिल्या 10 ओव्हरनंतरची स्थिती पाहिल्यास इंग्लंडने पाकिस्तानला 300 धावांचं टार्गेट दिल्यास ते केवळ 6.1 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागेल. हे समीकरण प्रत्यक्षात अशक्य आहे. म्हणजेच पाकिस्तान सामना जिंकला तरी नेट रन रेटच्या दृष्टीने न्यूझीलंडच्या खालीच राहणार आहे.

भारताचं स्थान निश्चित

भारताचा नेदरलॅण्डविरुद्धचा सामना शिल्लक असला तरी तो सामना भारत सहज जिंकेल असं म्हटलं जात आहे. तसेच या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी भारत पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी राहणार असल्याने भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिली सेमी-फायनल होणार हे निश्चित आहे. (sports news)

भारताचा सेमी-फायलनचा सामना कधी आणि कुठे?

भारत आणि न्यूझीलंडमध्ये 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर सेमी-फायनलचा सामना होणार आहे. आतापर्यंतच्या आयसीसीच्या सेमी-फायलन आणि फायलनच्या सामन्यांमध्ये कायमच न्यूझीलंडने भारताला पराभूत केलं आहे. मात्र यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताने तब्बल 21 वर्षानंतर न्यूझीलंडला वर्ल्ड कप स्पर्धेत धूळ चारली आहे. त्यामुळे आता 15 तारखेच्या सामन्यामध्ये न्यूझीलंडने भारताला हलक्यात घेणं महागात पडू शकतं.

दुसरा सामना कोणामध्ये आणि कधी?

सेमी-फायनलचा दुसरा सामना दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होणार आहे. हा सामना 16 नोव्हेंबर रोजी कोलकात्यामधील ईडन गार्डन्सच्या मैदानावर होणार आहे. या दोन्ही सामन्यांमधील विजेते संघ 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळतील.

…तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी

सध्या ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचा सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलिया बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 307 धावांचं टार्गेट जास्त ओव्हर ठेऊन गाठलं तर त्यांचा नेट रन रेट हा दक्षिण आफ्रिकेपेक्षा अधिक होईल आणि ते पॉइण्ट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचतील. मात्र त्यांचा सेमी-फायलनचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच होईल. पण पाऊस पडल्यास ज्या संघाचं नेट रनरेट आणि पॉइण्ट्स अधिक असतील त्या संघाला विजेता घोषित केलं जाईल. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी राहण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल यात शंका नाही.

भारत थेट फायलनमध्ये

सेमी-फायलनसाठी अतिरिक्त दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही पावसामुळे पुरेश्या ओव्हरचा खेळ झाला नाही तर पॉइण्ट्स टेबलच्या आधारे दुसऱ्या दिवशी जो संघ अव्वल स्थानी असेल त्याला फायनलमध्ये खेळता येईल. म्हणजेच मुंबईमधील भारत विरुद्ध न्यूझीलंडसामना पावसामुळे 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी न खेळवता रद्द झाला तर भारत फायनलमध्ये पोहचले. तसेच कोलकात्यामधील सेमीफायलनचा सामना पावसामुळे दोन्ही दिवशी पुरेश्या ओव्हरसहीत खेळता आला नाही तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यापैकी जो संघ दुसऱ्या स्थानी असेल त्याला विजेता घोषित केला जाईल. ऑस्ट्रेलियाने अधिक ओव्हर राखून बांगलादेशला पराभूत केलं तर दुसऱ्या स्थानी जातील आणि पावसामुळे सामना रद्द झाल्यास थेट फायलनमध्ये भारताविरुद्द खेळतील.

शक्यता कमी

सध्या तरी कोलकात्यामध्ये पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. मात्र मुंबईमधील सामना हा पुरेश्या ओव्हरसहीत निकाल निघण्याइतका नक्कीच खेळवता येईल. मुंबईमध्ये पावसाची कोणतीही शक्यता सध्या तरी व्यक्त करण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *