राणे पुत्रांकडून भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न

पुणे अपघात प्रकरणी अजितदादांचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना फोन करुन सक्त कायदेशीर कारवाई करण्याचे व राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडण्याचे आदेश दिले आहेत, असे असतानाही डाॅ. जितेंद्र आव्हाड हे अजितदादांबद्दल खोटे आरोप करीत आहेत. जितेंद्र आव्हाड यांना स्वप्नात अजितदादाच दिसतात, कायम एका द्वेषाने ते अजितदादांबद्दल बोलत असतात. स्वतःच ठेवायचे झाकून आणि दुसर्‍याचे पहावे वाकून ही आव्हाड यांची प्रवृत्ती आहे.
अजितदादांनी आव्हाडांच्यासाठी दोनदोनदा ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता हे ते विसरलेले दिसतात. जितेंद्र आव्हाड यांना मी तिसऱ्यांदा आव्हान देतो की, कळव्याचे अनधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यालय पाडण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांना ट्विट करावे.

नितेश राणे आणि निलेश राणे यांनी अनेकदा भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे, अंजलीताईंनी ॲक्टिव्हिजमच्या नावावर सनसनाटी आरोप करणे बंद करावे, असा हल्लाबोल प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

पुण्याला जो दुर्दैवी अपघात झाला आणि जो निष्पाप तरुणांचा जो बळी गेला याच्यावरून महायुतीचे सरकार आणि महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या तीनही नेत्यांनी पुणे अपघात प्रकरणी निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. येरवडा पोलिस स्टेशनमधल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी केसच्या सुरुवातीला जो निष्काळजीपणा केला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे. ससून हाॅस्पिटलमधील दोन डाॅक्टर यांनी रक्ताचे सॅम्पल बदलले. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. दोन्ही पोलीस अधिकार्‍यांना व डाॅक्टरांना अटक करण्यात आली आहे. ससून हाॅस्पिटलप्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन करून चौकशी सुरु करण्यात आली आहे. पण सातत्याने विरोधीपक्षातील नेत्यांना, महायुतीतील तीनही नेत्यांवर आरोप करण्याची जणू सवयच लागली आहे.

खासकरुन ठाण्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते, माजी मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांना तर स्वप्नात कायम अजितदादाच दिसतात. ऐनकेनप्रकारेन महाराष्ट्रात कुठेही कुठली दुर्घटना झाली की त्याचा संबंध अजितदादांशी लावायचा ही यांची नेहमीची सवय झाली आहे. कालच वक्तव्य करताना त्यांनी सांगितले की अजितदादांनी पुणे पोलीस आयुक्तांना किती वेळा फोन केला, काय बोलले याची चौकशी झाली पाहिजे. अजितदादांनी काल पत्रकार परिषद घेताना स्वतः हे सांगितले की मी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना फोन करुन सक्त कायदेशीर कारवाई करा अशाप्रकारचे निर्देश दिले आहेत. कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नका, असे आदेश दिले आहेत.

माझा जितेंद्र आव्हाड यांना सवाल आहे की याच अजितदादा पवारसाहेबांनी आपल्यासाठी ज्यावेळी ३५४ गुन्हा दाखल झाला. त्यावेळी आपल्यासाठीदेखील ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता. की आपण व्हिडिओ पूर्ण न बघता, चौकशी न करता आमचे सन्मानीय आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ३५४ चा गुन्हा कसा दाखल केलात ? हे आपण विसरलात का ? हरहर महादेवच्या वेळेला ज्यावेळेला तुम्हाला, आम्हाला, माझ्या सर्व कार्यकर्त्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशनने अचानकपणे क्रिमिनल ॲमेंडमेंट ॲक्ट सेक्शन ७ /१९३२ लावला, त्यावेळी देखील तत्कालीन ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना माननीय अजितदादा पवार हे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी फोन केला होता, हे आपण विसरलात का ? ऐनकेनप्रकारेन अजितदादांशी संबंध जोडायचा अजितदादांवर कशी टीका करता येईल, हा तुमचा केविलवाणा प्रयत्न असतो. पुण्याचे ब्रम्हा बिल्डरबरोबर नाव जोडण्याचा प्रयत्न केलात.जितेंद्र आव्हाड आपल्याला फार फोटो क्लिक करायची सवय असते. नवनियुक्त ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना आपण ट्विट केले होते की, कळवा-मुंब्र्यामध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामाचे फोटो मी पाठवतो. मी जितेंद्र आव्हाड यांना तिसऱ्यांदा आव्हान देत आहे की, कळव्याचे आपले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यालय हे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व मध्य रेल्वेच्या जागेवर उभे आहे, असा फोटो देखील आपण सौरभ राव यांना ट्विट करावा. माझी मागणी आहे, ठाण्याचे कलेक्टर, ठाण्याचे तहसिलदार, ठाणे महापालिका आयुक्त यांनी या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या अनधिकृत कार्यालयाची दखल घ्यावी. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर खोटेनाटे आरोप करणे ही जितेंद्र आव्हाड यांना नेहमीची सवय आहे. स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसर्‍याचे पहावे वाकून ही त्यांची प्रवृत्ती आहे. कायम एका द्वेषाने ते अजितदादांबद्दल बोलत असतात. पहिल्यांदा तुमच्या अनधिकृत कार्यालयाचे फोटो प्रथम ट्विट करा, तुमच्यासाठी अजितदादांनी दोन दोनदा फोन केले होते, एका गुन्ह्यात मी सहआरोपी असल्याने साक्षीदार आहे. यामुळे उगाचच अजितदादांवर टीका करणे बंद करा.

निलेश राणे व नितेश राणे यानी अनेकदा भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला

खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळसाहेब यांनी आपली भूमिका अनेकदा मांडली आहे. यामुळे भुजबळसाहेबांना लक्ष्य करणे चुकीचे आहे पण निलेश राणे व नितेश राणे यानी अनेकदा भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच माझी अंजली दमानिया यांना एक विनंती आहे, त्यांच्याबद्दल व्यक्तिशः मला खूप आदर आहे. पण ॲक्टिव्हिजमच्या नावावर सनसनाटी आरोप करणे त्यांनी बंद करावेत. अजितदादांची नार्कोटेस्ट घ्यायची कुठलीही गरज नाही. अजितदादांनी स्वतः म्हटले होतै की, मी पोलीस आयुक्तांना फोन करुन सांगितले आहे की, पुणे अपघात प्रकरणी कठोर कायदेशीर कारवाई करा आणि जे दोषी आहेत त्यांना अजिबात कुठल्याही प्रकारची सहानुभूती दाखवता कामा नये. त्यामुळेच आज तीन आरोपी जेलमध्ये आहेत, दोन पोलीस अधिकारी जेलमध्ये आहेत व दोन डाॅक्टर जेलमध्ये आहेत. त्यामुळे कायद्याचे शासन महायुतीच्या राज्यामध्ये आहे. योग्य पद्धतीने सर्व कारवाई केली जात आहे. यामुळे अंजलीताईंना विनंती आहे की केवळ सनसनाटीसाठी नार्कोटेस्ट करायला पाहिजे असे कोणतेही आरोप त्यांनी करु नयेत, असा इशारा प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.

अन्न भूखच भागविते

अन्न हे अन्न असते ते चांदीच्या ताटावर दिले काय आणि पत्रावळीवर दिले काय ज्यांचे संस्कारच चुकीचे आहे.त्यांना अन्नाची किंमत काय कळणार? त्यामुळे अन्न हे सोन्याच्या -चांदीच्या ताटात दिले काय आणि ते पत्रावळीवर दिले काय, अन्न हे मुखातुन पोटात गेल्यावर ते माणसाची भूखच भागविते.

मनुस्मृतीचे अभ्यासक्रमात येणे चुकीचे

कालच पक्षाच्या लोकसभा निवडणुकीनंतर सर्व मंत्री,आमदार, खासदार, पदाधिकारी यांची बैठक झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ मंत्री माननीय छगन भुजबळसाहेबांनी मतुस्मृतीचा मुद्दा उपस्थित केला होता. पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा शिव,शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा आमचा पक्ष आहे. शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपकजी केसरकर यांच्याशी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब हे बोलणार आहेत की, अशाप्रकारे मनुस्मृतीचे अभ्यासक्रमात येणे हे चुकीचे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा विरोधच करील.

कोकण पदवीधर निवडणूकीत महायुतीबरोबर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीमध्ये सत्तेत आहे. यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या ज्या उमेदवाराला तिकीट मिळेल, त्याच्यामागे आम्ही खंबीरपणे उभे राहू, त्याचे काम करु.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *