कोल्हापूर जिल्ह्यात दुसरे मंत्रिपद मिळणार का ? ‘ही’ नावे चर्चेत!

(political news) राज्यातील शिंदे, फडणवीस, पवार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली असतानाच जिल्ह्यातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे आणि आ. प्रकाश आबिटकर यांची नावे चर्चेत आली आहेत. आ. हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्याने जिल्ह्यात आणखी मंत्रिपदाची संधी मिळणार का याकडे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेपासूनच जिल्ह्यातील आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे, आ. प्रकाश आबिटकर यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या की या नावांचा आवर्जून उल्लेख होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्ह्यात प्रकाश आबिटकर हे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणारच, अशी कार्यकर्त्यांची धारणा आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून चर्चेत असलेले आ. विनय कोरे आणि प्रकाश आवाडे यांना भाजपच्या कोट्यातून संधी मिळेल, अशी कार्यकर्त्यांंची अपेक्षा आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या राजकीय भूकंपात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने राज्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातीलही राजकीय चित्र बदलले. जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने आता पुन्हा जिल्ह्यात मंत्रिपद मिळणार का, मिळालेच तर कोणाच्या गळ्यात ही माळ पडणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. (political news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *