रांगणा किल्‍ल्‍यावर रात्रभर अन्न, पाण्याविना अडकलेल्‍या पर्यटकांची सुटका

रांगणा किल्ल्यावर वर्षा पर्यटनासाठी गेलेले पर्यटक (tourists) रात्रभर अडकले होते, मात्र स्थानिक रहिवाशी, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने पंधरा ते सोळा पर्यटकांची आज (बुधवार) पहाटे सुटका करण्यात आली.

वर्षा पर्यटनाला भुदरगड तालुक्यात चांगलाच बहर आला आहे. पावसाच्या उघडझापीमुळे पर्यटक पाटगाव परिसरातील नयनरम्य निसर्ग व शिवडाव-नाईकवाडी, नितवडे-खेडगे, तोरस्करवाडी येथील धबधबे तसेच रांगणा किल्ल्यावर पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात जात आहेत, मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे नदी नाल्यातून जोरदार पाणी प्रवाह सुरू झाला आहे. मंगळवारी रांगणा पर्यटनासाठी कोल्हापुरातील गेलेले पंधरा ते सोळा पर्यटक (tourists) भटवाडी चिक्केवाडीच्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे रात्रभर अन्न, पाण्याविना अडकले होते.

तांब्याची वाडीचे पोलीस पाटील, अंतुर्लीचे पोलीस पाटील व स्थानिक रहिवाशी, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित देशमुख, आपत्ती व्यवस्थापन पथकाने बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सुटका केली. यासाठी दोरखंडाचा वापर करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *